समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे | सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सामजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे | सामाजिक न्याय विभागाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस बदलत आहे, आगामी काळातही कामात सातत्य ठेवून समाजकल्याण खात्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी आणखीन चांगले काम करावे; ‘सामाजिक न्याय’ संकल्पना डोळ्यासमोर ठेवून समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्यवतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लोणावळा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, सामाजिक न्याय खात्यातील सहसचिव सो.ना. बागुल, उपसचिव वर्षा देशमुख, अवर सचिव सतीश खैरमोडे, राज्यातील प्रादेशिक उपायुक्त, सहायक उपायुक्त उपस्थित होते. श्री. शिरसाट म्हणाले, विभागाच्यावतीने विद्यार्थी घडविण्याचे फार मोठे काम करण्यात येते. विद्यार्थीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी वसतिगृहाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे राज्यात वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करुन त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करण्यात यावा. विभागामध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. त्यांनीही विभागात आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी छाप निर्माण करावी, राज्याला दिशादर्शक होईल यादृष्टीने नवनवीन उपक्रम राबवावेत, या उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करण्याची गरज आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयाच्याजवळ निवासस्थान उपलब्ध करण्यासोबतच सोसायटी स्थापन करण्याबाबत नियोजन करावे.

कार्यशाळा ही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विचारांची देवाण-घेवाण तसेच त्यांच्या अडीअडचणी मांडण्याची व्यासपीठ आहे, त्यामुळे या कार्यशाळेचा आनंद घेत विचाराची देवाण-घेवाण करावी. याठिकाणी झालेले निर्णय, चर्चेच्या अनुषंगाने विभागात प्रभावीपणे अंमलबजावणी करून आगामी सकारात्मक परिणाम दिसले पाहिजे. राज्याच्या अर्थसंकल्पात विभागासाठी मंजूर झालेला निधी वेळेत खर्च होईल, यादृष्टीने काम करावे, असेही शिरसाट म्हणाले.

प्रधान सचिव डॉ. कांबळे म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. विभागाच्यवतीने समाजातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नागरिक आदी घटकांसाठी लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन त्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी काम करावे. येत्या काळात शिक्षण, पायाभूत सुविधा, उद्योजकता, सामजिक सुरक्षा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर या पाच पैलूंवर काम करुन विभागाची धोरण ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे विभागाने विकसित महाराष्ट्र २०२७ चा दृष्टिकोन समोर ठेवून प्रभावीपणे काम करावे, असेही डॉ. कांबळे म्हणाले. श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागावतीने येत्या काळात नवनवीन धोरणे, योजना राबविण्याचा मानस आहे. केंद्र सरकारच्या ‘आय-गॉट’ संकेतस्थळाच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या वर्षी प्रथमच आयोजित करण्यात आल्या, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऊसतोड कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांच्या कल्याकरिता काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेचा विभागाला निश्चित उपयोग होईल, असेही श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या. यावेळी दिवसभर विविध योजनांच्या संदर्भात प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी सादरीकरण केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email0
Facebook20
X (Twitter)20
LinkedIn20
Share
Telegram20
WhatsApp20
Copy link
URL has been copied successfully!