लाईव्ह महाराष्ट्र मराठी | दि.१८
छत्रपती संभाजी नगर | शेतातील उत्पादनांना योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटिला आला आहे. त्यातच कांद्याला बाजारात तुरळक भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांना केलेला मशागतीचा खर्चही निघत नसल्याने ऐन उन्हाळ्यात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या वतीने वैजापूर तालुक्यातील जांबरगाव इंटरचेंज क्रमांक १९ येथे चक्काजाम करून समृद्धी महामार्ग रोखला.

माजी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत गळ्यात कांद्याच्या माळ घालून राज्यसरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून समृद्धी महामार्गावरील वाहने रोखली. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी लावून धरत यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी या कोडग्या सरकारला दाखवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असे म्हणत आंदोलकांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला.

काय आहेत मागण्या….
- नाफेडमार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करा
- कांद्याला किमान ₹२,००० हमीभाव आणि ₹१,५०० अनुदान द्या,
- निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवून खत अनुदान थेट खात्यात जमा करा
- कांदा चाळीसाठी ७५% अनुदान व दर्जेदार बियाणे सवलतीत द्या
- कांद्याची निर्यात खुली करा
अशा विविध मागण्या यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या वतीने करण्यात आल्या.
